वाघडोहची उंच भरारी; स्मार्ट ग्राम स्पर्धेचा जिंकला प्रथम पुरस्कार:संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातही द्वितीय पुरस्कार
2 hours ago
1
अचलपूर तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वाघडोह ग्रामपंचायतीने उंच भरारी घेतली असून या ग्रामपंचायतीने स्मार्ट ग्राम स्पर्धेत पहिला आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. ग्रामपंचायतीने केलेले प्रभावी कार्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी हा पुरस्कार घोषित झाला आहे. वाघडोह ग्रामपंचायतीच्या सरपंच भाग्यश्री संतोष लंगोटे यांनी सुरुवातीपासूनच स्वच्छता आणि सुविधा या बाबींसह विविध लोकोपयोगी उपक्रमांना प्राधान्य दिले. विशेष असे की त्यांच्या नेतृत्वाला उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामस्थ यांनीही साथ दिली. त्यामुळेच वाघडोह गावात स्वच्छतेच्या पातळीवर मोठा सुधारणा करण्यात आली आहे. या पुरस्कारामुळे गावाच्या विकासाला अधिक प्रोत्साहन मिळेल, तसेच इतर ग्रामपंचायतींसाठी वाघडोह ग्रामपंचायतीचे कार्य आदर्श ठरेल. सरपंच भाग्यश्री लंगोटे यांच्या नेतृत्वाखाली वाघडोह गावाने स्मार्ट ग्राम आणि स्वच्छता अभियानात महत्त्वाची भूमिका निभावली आहे आणि भविष्यातही ग्रामविकासाच्या प्रक्रियेत हा प्रेरणादायक पाऊल ठरेल. या पुरस्कार निवडीची प्रक्रिया जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात निवड समितीने केली. वाघडोह ग्रामपंचायतीला पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी सुधीर अरबट, विस्तार अधिकारी आदींचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले आहे. भूमिगत गटार व स्वच्छतेला प्राधान्य : वाघडोह ग्रामपंचायतीने आरोग्य, स्वच्छता, पाणी या बाबीवर विशेष लक्ष केंद्रीत करत शासकीय योजना यशस्वीपणे राबविल्या. जलजीवन मिशन अंतर्गत मजिप्राच्या माध्यमातून जलवाहिनी अंथरली व त्या माध्यमातून पाणी पुरवठा केला. आरोग्याच्या सोयी सुविधेसाठी भूमिगत गटार, नाल्याची बांधकामे व स्वच्छता करत कचराकुंडीची सोय करत गावात सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कर वसुलीत सर्वांना न्याय शासकीय योजनेसोबत गावाचा विकास केला. सरपंच यांच्या मते गावकऱ्यांनी मालमत्ता कर वसुली संदर्भात केलेले सहकार्य महत्वाचे ठरले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मालमत्ता कर वसुलीला प्राधान्य देत सर्वांना सारखा न्याय देण्याचे काम करण्यात आले. आता पुरस्काराच्या रकमेतून गाव विकासाला प्राधान्य दिले जाईल, असेही सरपंच भाग्यश्री लंगोटे यांनी स्पष्ट केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)