शिवराज राक्षेने पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे होत्या:10 सेकंदात त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणे योग्य नाही - डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील
2 hours ago
1
अहिल्यानगर येथे 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात झालेल्या गोंधळामुळे ही स्पर्धा चांगलीच वादात सापडली आहे. या वादावर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही प्रतिक्रिया पंचांच्या चुकीच्या निर्णयावर संताप व्यक्त केला. शिवराज राक्षेने पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे, असे चंद्रहार पाटील म्हणाले. 20 वर्षाची मेहनत 10 सेकंदात वाया घालवणार असेल तर हे योग्य नाही, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. या सामन्यात 40 सेकंदात पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले. पंचांनी चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षे याने पंचांशी वाद घातला. शिवराजने एका पंचाला लाथ देखील मारली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित केले आहे. या प्रकारावर प्रतिक्रिया देताना डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उपरोक्त खळबळजनक विधान केले. नेमके काय म्हणाले चंद्रकार पाटील?
कुस्ती स्पर्धेत जे झाले ते चुकीचे होते. मॅटवर असणाऱ्या पंचांची चूक आहे. एका अंगावर असताना कुस्ती देण्यात आली. माझ्या बाबतीतही असाच प्रकार तिसऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झाला होता. शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारणे चुकीचे होते, असे मी काल म्हटले होते. परंतु जो पंच होता त्याला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या, असे खळबळजनक विधान चंद्रहार पाटील यांनी केले. शिवराज 15-20 वर्षांची तपस्या करून महाराष्ट्र केसरीत तिसऱ्यांदा पोहचला होता. तुम्ही 10 सेकंदात त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करताय. पंचांना अशा प्रकारे शिक्षा मिळाली तरच पुढच्या काळात कुस्ती क्षेत्रात पंचांवर वचक बसेल, असेही ते म्हणाले. गोळ्या घातल्या पाहिजे यासाठी म्हणतोय, कारण 15-20 वर्ष शिवराज राक्षे मेहनत घेतोय. आमचा दिवस पहाटे 3 वाजता सुरू होतो. सण उत्सव नाही, सुट्टी नाही. त्यातून तो इथपर्यंत पोहचतो. अशावेळी चुकीच्या निर्णयामुळे त्याला बाद व्हावे लागणे हे योग्य नाही, असेही डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले. माझ्या बाबतीतही असेच घडले होते
चंद्रहार पाटील पुढे बोलताना म्हणाले, 2007, 2008 साली मी महाराष्ट्र केसरी झालो, तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी लढवणारा मी 60 वर्षातला पहिला पैलवान होतो. माझ्याबाबतीही असेच घडले होते. माझ्या बाबतीत जे घडले त्यानंतर मी आत्महत्येचा विचार केला होता. माझा तो विचार चुकीचा होता. शिवराजने खरेतर त्या पंचाला गोळी घालून कुस्ती क्षेत्राला संदेश दिला पाहिजे. ज्या प्रेक्षकांना कळत नाही त्यालाही ही कुस्ती बरोबर झाली नाही हे कळते. यात पृथ्वीराजची चूक नाही. परत स्पर्धा होणे शक्य नाही. परंतु शिवराज राक्षेच्या बाबतीत जे घडले ते अन्यायकारक आहे. ... म्हणून मला टोकाचे पाऊल उचलावे लागले - शिवराज
दरम्यान, कुस्तीगीर परिषदेने निलंबीत केल्यानंतर शिवराज राक्षेने प्रतिक्रिया दिली होती. सर्वकाही चुकीचे झाले असून सर्वांनी ते पाहिले आहे. कुस्तीचा व्हिडिओ तपासण्याची आम्ही विनंती केली होती. व्हिडिओ पाहूनच कुस्तीचा निर्णय घ्या, असे म्हणालो होतो. मी वारंवार हेच सांगतो होतो की, रिव्ह्यु दाखवा. त्यानंतर निर्णय घ्या. त्यानंतर घेतलेला निर्णय मान्य आहे. पण ते व्हिडिओही दाखवत नव्हते. विनंती करूनही त्यांनी मान्य केले नाही. मला शिविगाळ केली. म्हणून मला टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे शिवराज राक्षे याने सांगितले. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या खेळाडूचे नुकसान होत असेल तर महाराष्ट्रात किती खेळाडू आहेत, प्रत्येक खेळाडूवर अन्याय होत राहिला तर पंचांवर आक्षेप घेतला पाहिजे, असेही तो म्हणाला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)