Published on
:
07 Feb 2025, 9:57 am
Updated on
:
07 Feb 2025, 9:57 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरने नागपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार कामगिरी केली. त्याने इंग्लंडविरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि स्फोटक अर्धशतक झळकावले. पण तो या सामन्याचा भाग होणार नव्हता. विराट कोहलीला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्यानंतर अय्यरला संधी मिळाली. पण आता प्रश्न असा आहे की अय्यर कटकमध्ये होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळेल का? जर कोहलीचे कमबॅक झाले तर एका खेळाडूला बाहेर बसवावे लागेल. (Shreyas Iyer IND vs ENG 2nd ODI)
कोहली दुखापतीमुळे नागपूर वनडेमध्ये खेळला नाही. याच कारणास्तव श्रेयस अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आले. सामन्यापूर्वी अय्यर एक चित्रपट पाहत होता. पण अचानक रोहित शर्माने त्याला फोन केला आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतल्याचे सांगितले. अय्यरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याचा निर्णय टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरला. नागपूरमधील सामन्यात त्याने 36 चेंडूत 59 धावा फटकावल्या.
कोहलीचे कमबॅक झाले तर कोण बाहेर?
कोहलीच्या तंदुरुस्तीबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. पण अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, कटक वनडेपूर्वी कोहली तंदुरुस्त होऊ शकतो. जर तो तंदुरुस्त असेल तर तो प्लेईंग इलेव्हनचा भाग बनेल, ज्यामुळे एका खेळाडूला बाहेर बसावे लागेल. अशा परिस्थितीत श्रेयसलाच ब्रेक दिला जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने 4 विकेट्सने जिंकला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 248 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारताने 38.4 षटकांत लक्ष्य गाठले. श्रेयस अय्यरने वादळी अर्धशतक फटकावले. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार ठोकले. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत आघाडी घेतली.