Published on
:
11 Oct 2024, 11:45 pm
Updated on
:
11 Oct 2024, 11:45 pm
डॉ. ऋतू सारस्वत, समाजशास्त्राच्या अभ्यासक
भारतात स्वच्छ भारत मिशनमुळे 2011 ते 2020 या दरम्यान वार्षिक 60 ते 70 हजार बालमृत्यू रोखण्यास मदत झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. देशातील 35 राज्ये आणि 640 जिल्ह्यांतील बाल मृत्युदर आणि पाच वर्षांपर्यंतच्या बाळांचा मृत्युदराच्या आकड्यांचे आकलन करताना स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी आणि त्यापूर्वीची स्थिती याची तुलना करण्यात आली. यात देशात बालमृत्यूच्या दरात मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले.
अलीकडेच ब्रिटिश मासिक ‘नेचर’मध्ये प्रकाशित ‘टॉयलेट कन्स्ट्रक्शन अंडर द स्वच्छ भारत मिशन अँड इन्फेट मॉर्टेलिटी इन इंडिया’ या अहवालात म्हटल्यानुसार भारतात स्वच्छ भारत मिशनमुळे 2011 ते 2020 यादरम्यान वार्षिक 60 ते 70 हजार बालमृत्यू रोखण्यास मदत मिळाली. कॅलिफोर्निया विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय खाद्य धोरण संशोधन संस्था आणि ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी स्वच्छ भारत मिशन आणि भारतातील बाल तसचे पाच वर्षांपक्षा कमी वयोगटातील मृत्युदरासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी अभ्यास केला. याप्रमाणे देशातील 35 राज्ये आणि 640 जिल्ह्यांतील बाल मृत्युदर आणि पाच वर्षांपर्यंतच्या बाळांच्या मृत्युदराच्या आकड्यांचे आकलन करताना स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी आणि त्यापूर्वीची स्थिती याची तुलना करण्यात आली. यात देशात बालमृत्यूच्या दरात मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले. ज्या जिल्ह्यात प्रामुख्याने स्वच्छतागृहाचे काम वेगाने झाले तेथे बालमृत्युदरात 5.3 टक्के दराने घट दिसून आली.
ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण गंभीर आहे. पहाटेच्या वेळी रस्त्यालगत किंवा शेतात, आडबाजूला ग्रामस्थ शौचास जातात; परंतु आता हे चित्र बदलत आहे. उघड्यावर शौच केल्याने वातावरणावर आणि मानवी शरीरावर होणार्या गंभीर परिणामाची जाणीव लोकांना करून देण्यात आली. उघड्यावर शौच केल्याने नवजात बालकाचा मृत्यू कसा होऊ शकतो, यावर नागरिकांना विचार करण्यास या मोहिमेने भाग पाडले. या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी जुलै 2015 मध्ये प्रकाशित ‘रिस्क ऑफ अॅडव्हर्स प्रेग्नसी आऊटकम्स अमंग वुमन प्रॅक्टिसिंग पुअर सॅनिटेशन इन रुरल इंडिया : अ पॉप्युलेशन बेस्ड प्रोस्पेक्टिव्ह कोहार्ट स्टडी’च्या अभ्यास अहवालाचे निष्कर्ष जाणून घेतले पाहिजेत. या अभ्यासात 670 गर्भवतींचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनातून समोर आलेली बाब म्हणजे, ज्या दोन तृतियांश गर्भवतींनी उघड्यावर शौच केले, त्यापैकी एक चर्तुथांश महिलांना बाळंतपणाच्या वेळी कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. यात समान आढळून येणारी बाब म्हणजे, अशक्त बाळ जन्माला येणे किंवा मुदतीपूर्वीच जन्म होणे या गोष्टी घडल्या. याचवेळी स्वच्छतागृहाचा वापर करणार्या गर्भवतींना अशा प्रकारचा अनुभव आला नाही. जागतिक पातळीवर यासंदर्भात असंख्य संशोधन करण्यात आल्यानंतर एक गोष्ट सिद्ध झाली आणि ती म्हणजे उघड्यावर शौचास जाणे आरोग्याला हानिकारक आहे.
‘सॅनिटेशन अँड डिसिज, हेल्थ एस्पेक्टस् ऑफ वेस्ट वॉटर अँड एक्सक्रेट मॅनेजमेंट’ नावाच्या जागतिक बँकेचा अहवाल म्हणतो, उघड्यावर शौच हे थेटपणे पर्यावरणाच्या संपर्कात येते आणि त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. मानवी मलात लाखो संसर्ग, विषाणू असतात आणि त्यामुळे अतिसार, जलजन्य आजार पसरतो. सभोवताली सतत संसर्गजन्य आजाराचा प्रसार होत असेल, तर बाळांचे पोट सतत बिघडत राहते आणि त्यामुळे त्यांचे पोषक तत्त्व पचविण्याची शक्ती कमी होते. ते कुपोषणाचा सामना करण्याची शक्ती गमावून बसतात. उघड्यावरच्या शौचापासून मुक्तीची बाब ही भारतीय बाळांसाठी जीवरक्षक म्हणूनच नाही, तर त्याच्या आरोग्यावरचे सर्वंकष सकारात्मक परिणामही समोर आले आहेत. एका अभ्यासानुसार, स्वच्छतागृह सुविधांअभावी उघड्यावर शौच करण्याची वेळ येत असल्याने महिलाही स्वत:चा आहार कमी ठेवतात आणि पाणीही कमी पितात. एकार्थाने स्वत:वर दिवसा शौचास जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी त्या आहाराचे प्रमाण कमीच ठेवतात. परिणामी, त्यांना शारीरिक व्याधी होण्यास सुरुवात होते. अर्थात, उघड्यावर शौच केल्याने मौखिक, शारीरिक अणि लैंगिक अत्याचाराची शक्यता राहते आणि या गोष्टी महिलांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कारणीभूत ठरू शकतात.