Published on
:
08 Feb 2025, 4:08 am
Updated on
:
08 Feb 2025, 4:08 am
नाशिक : मी फाटका माणूस आहे. माझ्याकडे ईडी, सीबीआय कशासाठी येतील? आले तरी त्यांना काय सापडणार?, असे नमूद करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी 'आॉपरेशन टायगर'चे वृत्त फेटाळले आहे. राज्य आणि केंद्रातही महायुतीचे सरकार स्थिर आहे. तरी अशी चर्चा होते हे मला न समजण्यासारखी गोष्ट आहे. हे माझ्या कल्पनाशक्तीच्या पलिकडचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाआधी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी देखील या हालचालींना दुजोरा दिला होता. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही अफवा असल्याचे सांगत शिंदे गटावर जोरदार तोफ डागली आहे. यानंतर नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार वाजे यांनी देखील हे वृत्त फेटाळले आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना वाजे म्हणाले, असा कुठलाही संपर्क माझ्याशी झालेला नाही. आमच्यामध्ये अशी चर्चा देखील झालेली नाही. कालच पक्षाच्या संसदीय कार्यालयाचे खा. राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सर्वच खासदार त्यासाठी हजर होते. आमच्यात खेळीमेळीची चर्चा झाली. पक्षाचे काम अधिवेशनात कसे करायचे? पक्षाची बाजू कशी मांडायची? याबाबत आमची चर्चा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून अनेकदा पक्षप्रवेश असल्याचे पाहायला मिळत आहे. तुमच्यासोबत देखील असेच घडत आहे का? असे विचारले असता माझ्या बाबतीत असे व्हायचे काहीच कारण नाही. माझ्याकडे काहीच नाही. मी फाटका माणूस आहे. माझ्याकडे ईडी, सीबीआय कशासाठी येतील? आले तरी त्यांना काय सापडणार आहे? असे वाजे यांनी म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात प्रवेश करणार, अशा चर्चा वारंवार रंगताना पाहायला मिळत आहे. याबाबत विचारले असता वाजे म्हणाले की, मला तेच समजत नाही की हे का होत आहे? कारण राज्यात मोठ्या प्रमाणात युतीसोबत आमदार आहेत. राज्य सरकार स्थिर आहे. केंद्रातही सरकार स्थिर आहे. तरी अशी चर्चा होते हे मला न समजण्यासारखी गोष्ट आहे. हे माझ्या कल्पनाशक्तीच्या पलिकडचे आहे, असे त्यांनी सांगितले.