आजच्या घडीला एकनाथ शिंदेंना कोणी विचारात नाही:त्यांना त्यांचे लोक सांभाळणे जड जाणार, अंबादास दानवे यांचा टोला

2 hours ago 3
शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. आजच्या घडीला शिंदेंना कोणी विचारात नाही. येणाऱ्या काळात शिंदेंना त्यांचे लोक सांभाळणे जड जाणार असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हंटले आहे. अंबादास दानवे म्हणाले, आत्ताच्या घडीला शिंदेंनाच कोणी विचारात नाही या महाराष्ट्रामध्ये. आज तुम्ही पाहिले असेल एस.टी महामंडळाचा चेअरमन नियुक्त करताना त्या कॅबिनेटला सुद्धा माहिती दिली नव्हती. असे सरकार असताना या भानगडी शिंदे तरी का करतील असा माझा प्रश्न आहे. छोटे मोठे कार्यकर्ते जाणे ठीक आहे पण प्रत्यक्ष खासदाराविषयीच अशा अफवा पसरवणे चुकीचे आहे. आता एकनाथ शिंदे यांना त्यांचे त्यांचे नेते आमदार सांभाळणे कठीण जाणार आहे. त्यांना त्यांचे सांभाळणे हेच चॅलेंज राहणार आहे. अंबादास दानवे म्हणाले, भाजप सगळीकडे फिल्डिंग लाऊन बसले आहेत. नितीश कुमारच्या पक्षात देखील त्यांनी तसे केले होते, तसेच एकनाथ शिंदेंच्या पक्षात सुद्धा ते करू शकतात. पुढे ऑपरेशन टायगर बद्दल बोलताना अंबादास दानवे म्हणाले, हे कुठेच नाहीये, हे तुम्ही मीडियाने पासरवलेले आहे. कोणता तरी नेता म्हणाला आहे का ऑपरेशन टायगरबद्दल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना विश्वासात घ्यायलाच 5 वर्षे लागतील. त्या पदावर बसून तसेच काम करावे लागते. शेवटी जसे पेरले तसेच उगवत असते. ठीक आहे फडणवीस साहेबांनी एसटीचे केले असेल. पण एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना किती ऐकले त्यांचे? पुरावे आहेत आमच्याकडे, किती फेरबदल झाले आहेत त्याचे. त्यामुळे पेरले तसे उगवत असते हा सृष्टीचा नियम आहे. अंबादास दानवे म्हणाले, निवडणुकीवर आता सर्व सामान्य जनतेचा सुद्धा विश्वास उरला नाही. आज एक मारकडवाडी आहे, उद्या शेकडो मारकडवाड्या या महाराष्ट्रामध्ये आहेत. दिल्लीमध्ये सुद्धा लोकांच्या भावना अशाच राहिल्या आहेत. भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोग, पोलिस यंत्रणा सगळे कामाला लावते. त्यामुळे अशा पद्धतीने जर बघितले तर येत्या काळात मतदान करायचेच की नाही करायचे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ शकणार आहे. कारण माझे मत ज्याला पडायचा त्याला पडत नसेल तर मतदान करायला का जायचे? अशी मानसिकता येणाऱ्या काळात झाली तर त्यात आश्चर्य वाटायला नको. लाडकी बहीण योजनेवर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, आम्ही जेव्हा लोकांना सांगत होतो तेव्हा लोकांना खोटे वाटत होते. ही निवडणुकीसाठी सुरू केलेली योजना आहे. ही लाच आहे. त्यावेळेस सरसकट मंजूर केले, आता का नाही? आता तुम्हाला सर्वेक्षण आले का? आता चारचाकी दिसायला लागली का? निवडणुकीच्यावेळी नाही दिसली चारचाकी, दुचाकी, ज्यांना दुसऱ्या योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना या योजनेचा लाभ नाही मिळणार हे त्यावेळी का नाही सांगितले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. लाडकी बहीण लाडकी बहीण असे म्हणून म्हणून घेतले आणि आता या सगळ्या बहिणींना फसवणूक करणारे भाऊ या राज्याच्या सरकारमध्ये आहेत, असे अंबादास दानवे म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article