डॉ.डी.वाय.पाटीलमध्ये आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन:10 देशांतील तज्ज्ञांचा सहभाग; आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळत आहे - आयुष मंत्री जाधव
2 hours ago
1
आयुर्वेद सर्व प्रकारच्या व्याधींवर परिणामकारक उपचारपद्धती आहे. आयुर्वेदाला जगभर सर्वमान्यता मिळू लागली आहे. प्रभावी आयुर्वेदासाठी संशोधनाची व्याप्ती वाढवण्यासह इनोव्हेशन व स्टार्टअप सुरु करण्यासाठी आयुष मंत्रालयामार्फत चालना देणार आहे," असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. सर्वगुणकारी आयुष औषधी सहज उपलब्ध होण्यासाठी देशभरात आयुष औषधी केंद्रांचे जाळे उभारण्यात येणार असल्याचेही प्रतापराव जाधव यांनी नमूद केले. डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठ संचालित डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे, यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथील ऑल इंडिया आयुर्वेद काँग्रेस, नेदरलँड येथील इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाउंडेशन व इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद यांच्या सहकार्याने आयोजित आठव्या इंटरनॅशनल आयुर्वेद काँग्रेसचे (आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन) उद्घाटन प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलगुरू व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव डॉ. स्मिता जाधव, खासदार श्रीरंग बारणे, अमेरिकास्थित शास्त्रज्ञ डॉ. टोनी नाडर, आयुष मंत्रालयाचे सल्लागार सचिव वैद्य मनोज नेसरी, नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनचे चेअरमन वैद्य जयंत देवपुजारी आदी उपस्थित होते. दहा देशातील १०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि १२०० हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील संशोधक, वैद्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. ५०० हुन शोधनिबंध सादर झाले. प्रतापराव जाधव म्हणाले, योग व आयुर्वेद ही भारताची ओळख आहे. शंभराहून अधिक देशांत आज आयुर्वेद पोहोचला आहे, तर १८० देशांत योगदिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आयुर्वेदीय औषधांना, उपचारांना प्रभावी करण्यासाठी व मान्यता मिळण्यासाठी सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. त्यामुळेच संशोधनावर भर दिला जात आहे. डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयांसारख्या संस्थांमध्ये संशोधन व विकास केंद्राची उभारणी करण्याचा विचार सुरु आहे. अनेक औषधांना आयएसओ मानांकन दिले जात आहे. देशातही घराघरात आयुर्वेद जाण्यासाठी 'देश का प्रकृती परीक्षण' उपक्रम आणला असून, त्यामध्ये सव्वाकोटी लोकांची माहिती संकलित केली आहे. डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन पुण्यात आणि तेही आमच्या संस्थेत होतेय, याचा आनंद आहे. जगभरातील आयुर्वेदतज्ज्ञ, विद्यार्थी इथे आल्याने विचारांचे आदानप्रदान होत आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये आयुर्वेदाचा समावेश ही चांगली बाब आहे. वैदिक संस्कृती, आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाऊल स्वागतार्ह आहे. आधुनिक शास्त्र आणि आयुर्वेद याची सांगड घालून संशोधनाधारित उपचारांची उपलब्धता समाजासाठी उपयुक्त ठरेल. आयुर्वेदाला प्रभावी, रास्त आणि सहज उपलब्ध करण्यासाठी आपण सर्वानी पुढाकार घेतला पाहिजे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)