वित्तीय वर्षात कोकण रेल्वे मालामाल, 301 कोटींचा झाला नफा

2 hours ago 1

कोकण रेल्वेला आता 26 वर्ष पूर्ण झाली आहेत. कोकण रेल्वे उभारणीचा कालावधी पकडला तर तो काळ 33 वर्षांचा आहे. गेल्या वित्तीय वर्षामध्ये कोकण रेल्वेला 301 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. हा नफा रेल्वे वाहतूक आणि प्रकल्प उभारणीतून झाला आहे. कोकण रेल्वे केवळ 644 किमी रेल्वेमार्गापुरती आता मर्यादित राहिली नसून रेल्वे प्रकल्पाच्या माध्यमातून कोकण रेल्वे देशातील 16 राज्यांमध्ये काम करत असल्याचा अभिमान कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी रत्नागिरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा आज रत्नागिरीमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोकण रेल्वेच्या प्रगतीविषयी माहिती दिली. कोकण रेल्वेने जम्मूमध्ये 19 हजार कोटी रुपयांचे कटरा-उधमपूर येथे रेल्वेमार्गाचे यशस्वी काम केले आहे. या मार्गावर 16 बोगदे आणि 22 रेल्वेपूल आहेत. आयफेल टॉवरपेक्षा उंच असलेला चिनाब रेल्वेपूल कोकण रेल्वेने उभारलेला आहे. तसेच एनजी रेल्वेपूल केबलवर उभारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वे नेपाळ आणि नैरोबीमध्येही काम करत असल्याचे झा यांनी सांगितले.

विद्युतीकरणातून 190 कोटींची बचत

कोकण रेल्वेमार्गावर विद्युतीकरण करण्यात आले आहे. या विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेची 190 कोटी रुपयांची बचत होत आहे. विशेष म्हणजे डिझेल इंजिन वापरल्यामु‌ळे पर्यावरणात प्रदूषण होत होते. विद्यु‌तीकरणामु‌ळे आता ते प्रदूषण बंद झाले आहे. त्यामुळे आता कोकण रेल्वे ग्रीन रेल्वे झाली आहे. कोकण रेल्वेच्या स्थानकांवर प्रवाशांसाठी लाउंज उभारले जाणार आहेत. हे लाउंज उच्च वर्गातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरीता मर्यादित नसून सर्वसामान्य प्रवासीही निर्धारित शुल्क भरून लाउंजमध्ये बसू शकतो, असे संतोषकुमार झा यांनी सांगितले. यावेळी मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, प्रधान मुख्य अभियंता नागदत्त, मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट उपस्थित होते.

रेल्वेस्थानक सुशोभिकरणाच्या कामाबाबत तक्रारी

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेस्थानकांचे सुशोभिकरण करण्यात आले होते. या सुशोभिकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारी आम्ही बांधकाम विभागापर्यंत पोहोचवल्या आहेत. काही ठिकाणी पावसाळ्यात गळती आणि पडझड झाल्याचेही संतोषकुमार झा यांनी सांगितले. कोकण रेल्वेमार्गावर संगमेश्वरसह अन्य स्थानकात गाड्या थांबवण्याबाबत अनेक मागण्यांचे प्रस्ताव आमच्याकडे आले आहेत. गाड्यांच्या थांब्यांबाबतचा निर्णय रेल्वे मंत्रालय घेत असते. त्यामुळे आम्ही रेल्वे मंत्रालयाकडे हे प्रस्ताव सादर केले आहेत. रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी दादरपर्यंत नेण्याचा निर्णय मध्यरेल्वेचा आहे. ही गाडी दादरपर्यंत गेली तर आम्हाला निश्चितच आनंद होईल असे, संतोषकुमार झा यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article