Published on
:
05 Feb 2025, 5:25 pm
Updated on
:
05 Feb 2025, 5:25 pm
नंदुरबार : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या जीबीएस आजाराची सदृश्य लक्षणे अक्कलकुवा तालुक्यातील दोन बालकांमध्ये आढळून आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी तातडीने संबंधित गावांमधील पाण्याचे नमुने तपासण्याची सुचना केली आहे. तसेच याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तथापि यातील एकाच बालिकेमध्ये जीबीएसची प्राथमिक लक्षणे दिसून आली असून अधिक तपासणीसाठी पुण्याला नमुने पाठवण्यात आले आहेत, असे शासकीय जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात जीबीएस रुग्णांसाठी २४ बेडचे स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, जीबीएसची लक्षणे आढळल्यास तात्काळ उपचार घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय राठोड यांनी केले आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील दोन बालकांना गेल्या आठ दिवसांपासून सर्दी, ताप व खोकल्यासारखी लक्षणे आढळून आली होती. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात असल्याने त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या रक्ताच्या व विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्याचे अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यात एका ११ वर्षे बालिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लहाडे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ संजय राठोड यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयात जीबीएस रुग्णांसाठी २४ बेडचे स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी आवश्यक असलेली साधन सांभरगी व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २४ पैकी चार बेड बालकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेटी यांनी पाण्याचे नमुने तपासणीचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.