भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका पार पडली. ही मालिका भारताने 4-1 ने जिंकली. या मालिकेत इंग्लंडला एकमेव सामना जिंकता आला. यासह भारतीय संघ 2012 पासून इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत अजेय राहिला आहे.
Image Credit source: BCCI
भारताने पाचव्या टी20 सामन्यात इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर ही मालिका भारताने आधीच जिंकली होती. पण पाचवा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा मानस होता. जोस बटलरने दव फॅक्टर समोर ठेवलं होतं. पण अभिषेक शर्माच्या वादळाबाबत अनभिज्ञ होता. अभिषेक शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 17 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यानंतर 37 चेंडूत शतक पूर्ण केलं. यानंतर त्याच्या फलंदाजीचा झंझावात सुरु होता. अभिषेक शर्माने 54 चेंडूत 135 धावा केल्या. त्याने 250 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. त्याच्या झंझावाती खेळीमुळे टीम इंडियाने 20 षटकात 9 गडी गमवून 247 धावा केल्या आणि विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान खरं तर खूपच कठीण होतं. पण इंग्लंडने चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर धडाधड विकेट पडल्या आणि पराभव निश्चित झाला. इंग्लंडचा डाव 97 धावांवर आटोपला आणि भारताने हा सामना 150 धावांनी जिंकला.
इंग्लंडकडून फिलीप सॉल्टने चांगली खेळी केली. त्याने 23 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 55 धावा केल्या. पण त्याची विकेट काढण्यात शिवम दुबेला यश आलं. त्यानंतर संपूर्ण सामना भारताच्या पारड्यात झुकला. त्याच्याशिवाय इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 ने जिंकली. 2012 पासून या दोन्ही संघात टी20 मालिका होत आहेत. पण तेव्हापासून टीम इंडिया प्रत्येक वेळी इंग्लंडवर भारी पडली आहे. मग ती मालिका भारतात असो की इंग्लंडमध्ये.. भारतीय संघ प्रत्येक वेळी इंग्लंडवर भारी पडला आहे.