महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाची सुरुवात:महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विशेष मोहीम; एकल महिलांना 'अभया' संबोधून सन्मान
2 hours ago
1
राष्ट्रीय महिला आयोगाने देशभरातील महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' ही विशेष मोहीम सुरू केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले की, सध्या राज्य व राष्ट्रीय महिला आयोग आणि कौटुंबिक न्यायालयात लाखो तक्रारी प्रलंबित आहेत. यापैकी सुमारे ५०-६० टक्के तक्रारी कौटुंबिक वादाशी संबंधित आहेत. लोहगाव येथील नीहार आनंदनिवास येथे वंचित विकास आणि उदयकाळ फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'अभया' राज्यस्तरीय परिषदेत त्या बोलत होत्या. या परिषदेत महाराष्ट्रातील ५० सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. रहाटकर यांनी एकल महिलांना 'अभया' म्हणून संबोधण्याचा आणि त्यांना दिव्यांगांप्रमाणे सन्मान देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे समाजात वाढत चाललेल्या अस्थिरतेबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, महिला एकाकी पडत आहेत आणि त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे असूनही अत्याचाराच्या घटना थांबत नाहीत. समाजाने एकल महिलांना स्वीकारून त्यांना सकारात्मक वातावरण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महिला आयोग एकल महिलांच्या समग्र विकासासाठी काही महत्त्वपूर्ण शिफारशी तयार करत असून त्या लवकरच केंद्र सरकारला सादर केल्या जातील. तसेच 'अभया' ही चळवळ देशभरात विस्तारित करण्यासाठी महिला आयोग प्रयत्नशील राहील असेही रहाटकर यांनी स्पष्ट केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)