राज ठाकरेंच्या मुलाचा अजित पवारांवर पलटवार:मी हरलो, पण खचलो नाही, मला पहिल्या नव्हे शेवटच्या निवडणुकीत जज करा -अमित ठाकरे

2 hours ago 2
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. पण मी खचलो नाही. मला माझ्या पहिल्या नाही तर शेवटच्या निवडणुकीत जज करा, असे ते म्हणालेत. अमित ठाकरे यांनी माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला. आमची एकच जागा निवडून आली. आम्ही काहीही बोललो नाही. त्यानंतर आम्ही काम करत राहिलो. विधानसभेला त्याचे फळ मिळाले. जनतेने आम्हाला निवडून दिले. पण तुम्हाला तुमचा मुलगाही निवडून आणता आला नाही. त्यामुळे आम्हाला काय बोलता? असे ते म्हणाले होते. पहिल्या नव्हे शेवटच्या निवडणुकीत जज करा अजित पवार यांच्या या टीकेला अमित ठाकरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, अजित पवारांना प्रत्युत्तर देण्यास मी अजून खूप लहान आहे. राज ठाकरेच त्यांना उत्तर देतील. पण एक सांगतो. मी निवडणुकीत हरलो तरी खचलो नाही. या निवडणुकीत मला खूप काही शिकता आले. मला इतर गोष्टींचा फरक पडत नाही. मला माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर शेवटच्या निवडणुकीत जज करा. मनसे हा ग्राऊंड लेव्हलवर काम करणारा पक्ष आहे. कुठेही एखादा विषय सुटला नाही तर तो राज साहेबांकडे येतो. त्यानंतर तो विषय मार्गी लागतो. प्रत्येक पक्षाला यश हवे असते. आमच्याही आयुष्यात ते येईल. आम्हीही सत्तेत बसू. राज ठाकरे हे राजकारणातील विराट कोहली व रोहित शर्मा आहेत. एवढेच नव्हे तर सचिन तेंडुलकर यांच्यासारखे कोणता बॉल कसा खेळायचा हे त्यांना माहिती आहे. मीही त्यांच्याकडूनच शिकत आहे. मनसेकडून महापालिकेची तयारी सुरू मनसे सध्या महापालिका निवडणुकीची तयारी करत आहे. मी मार्चपासून राज्यात दौरे करणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल राज ठाकरे यांना देणार आहे. महापालिका निवडणुकीत नक्कीच बदल होईल. कारण, बदल ही काळाची गरज आहे. मी आत्मपरीक्षण करत होतो. तेव्हा आमच्या काय चुका झाल्या हे लक्षात आले. म्हणून मी तसा अहवाल राज ठाकरे यांना देणार आहे, असे अमित ठाकरे म्हणाले. ईव्हीएमपेक्षा बॅलेट पेपरवर निवडणू घ्या अमित ठाकरे यांनी यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयावरही भाष्य केले. राज ठाकरे यांनी 2017 मध्ये सर्वच नेत्यांची भेट घेतली होती. त्यांनी सोनिया गांधी व ममता बॅनर्जी यांनाही सांगितले होते की, तुमचा ईव्हीएमवर विश्वास नसेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाका. ईव्हीएम आले म्हणजे प्रोग्रामिंग आले. त्याद्वारे तुम्ही कोणतीही फसवणूक करू शकता. या निवडणुकीत नाहीतर पुढच्या निवडणुकीत बदल होईल अशी आशा आहे. ईव्हीएमपेक्षा बॅलेट पेपर हे बेटर आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवरच निवडणूक घेतली पाहिजे. आम्ही याच मतावर ठाम आहोत. तुमची निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची इच्छा नसेल तर हेच रिझल्ट दिसतील. सध्या जे निकाल येत आहेत ते अनपेक्षित असेच आहेत, असे ते म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article