पती-पत्नीचा नातं विश्वासाच असतं. हाच या नात्याचा आधार-पाया असतो. तुमचं लग्न होतं, तेव्हा बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या असतात. एकमेकाला समजून गोडी गुलाबीने संसार करायचा असतो. पण काही व्यक्ती याला अपवाद असतात. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या डोक्यात संशयाच भूत असतं. यातून संसार बहरण्याऐवजी उलट नातं तुटायला सुरुवात होतं. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीच नववधूने असं सत्य सांगितलं की, नवरदेवाने तिची गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी आरोपी नवरदेव आणि त्याच्या आईला अटक केली आहे. या प्रकरणात अन्य पाच आरोपी फरार आहेत. अटकेनंतर पतीने जो खुलासा केला, त्याने पोलीसही हैराण झालेत.
उत्तर प्रदेशच्या बदायूंमधील हे प्रकरण आहे. अलापुर गावात राहणाऱ्या यादरामच्या मुलाचा नीरजचा शाहजहांपुरच्या रामनिवास यांच्या मुलीशी 22 जानेवारीला लग्न झालं. ज्या मुलीसोबत लग्न झालं, तिच्यासोबत नीरजचे आधीपासून प्रेमसंबंध होते. नात्यात असल्याने दोघांच लग्न लावण्यात आलं. दोघांमध्ये लग्नाआधीपासून शारीरिक संबंध होते. पण मुलीने ती गर्भवती असल्याच आधी सांगितलं नव्हतं.
‘लोकांनी टोमणे मारायला सुरुवात केली’
नीरजने पोलिसांना सांगितलं की, “लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीने मला सांगितलं की, ती अडीच महिन्याची गर्भवती आहे, तेव्हा मला धक्का बसला. मला विश्वासच बसला नाही. मी घरच्यांना या बद्दल सांगितलं. कुटुंबिय आणि आसपासच्या लोकांनी टोमणे मारायला सुरुवात केली. बरच काही माझ्याबद्दल बोललं जात होतं. ते मला सहन झालं नाही. त्यानंतर मी आईच्या साथीने पत्नीची गळा आवळून हत्या केली”
मुलीच्या वडिलांच म्हणणं काय?
रामनिवासने मुलीच्या मृत्यूनंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. नवरा, सासू कांता, सासरा यादराम, दीर रवी, नणंद अंजू, काका लालाराम आणि दिनेश यांनी, हुंड्याची मागणी पूर्ण केली नाही म्हणून माझ्या मुलीची गळा आवळून हत्या केली असा मुलीच्या पित्याचा आरोप आहे. पोलिसांनी पती आणि सासू कांता यांना अटक केली आहे. पाच आरोपी अजून फरार आहेत.