अभिनेत्री ममता कुलकर्णीने 90 च्या दशकामध्ये आपल्या चित्रपट करिअरला सुरुवात केली. जेव्हा तीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हा देखील ममता कुलकर्णी चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता ममता कुलकर्णीने अध्यात्माच्या वाटेवर जाऊन सन्यास घेतला आहे. मात्र तरी देखील वाद काही केल्या तिचा पिच्छा सोडण्यास तयार नाही. सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. या महाकुंभामध्ये ममता कुलकर्णीने संन्यास घेतला आहे. तीला किन्नर आखाड्याकडून महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली. ती तिथे सात दिवस राहिली देखील. मात्र त्यानंतर विरोध वाढल्यामुळे अखेर ममता कुलकर्णीला देण्यात आलेलं महामंडलेश्वर हे पद काढून घेण्यात आलं आहे.
त्यानंतर ममता कुलकर्णी एका टीव्ही शोमध्ये सहभागी झाली होती, या शो मध्ये बोलताना आपला साध्वी बनण्याचा प्रवास कसा सुरू झाला, हे सांगताना गेल्या 23 वर्षांमध्ये आपन एकही अॅडल्ट चित्रपट पाहिला नसल्याचा दावा तीने केला.मात्र यावेळी बोलताना तीन नवरात्रीमध्ये दारू पिल्याचा तिचा एक पूर्वीचा किस्सा देखील सांगितला.
ममता कुलकर्णीला या शोमध्ये विचारण्यात आलं की असं ऐकण्यात आलं आहे की, तु्म्ही नवरात्रीमध्ये व्रत करायच्या पण रात्री ताज हॉटेलमध्ये जाऊन दोन पेग दारू देखील प्यायच्या? यावर बोलताना अभिनेत्रीनं म्हटलं की जेव्हा मी बॉलीवुडमध्ये होते तेव्हा 1997 साली माझ्या आयुष्यात माझे गुरु आले.तेव्हा माझं आयुष्य असं होतं की मी जेव्हा शूटिंगसाठी जायचे तेव्हा माझ्याजवळ दोन बॅग असायच्या त्यातील एका बॅगेत माझे कपडे असायचे तर दुसऱ्या बॅगेत माझ्या देवाचं मंदिर असायचं, मी आधी टेबलवर देवाचं मंदिर ठेवायचे दर्शन करायचे आणि मग चित्रिकरणाला सुरुवात करायचे.
मी तेव्हा नवरात्रीचं व्रत केलं होतं. या 9 दिवसांमध्ये दिवसातून तीनदा यज्ञ करण्याचा मी संकल्प केला होता. मी ते 9 दिवस केवळ पाणी पिऊन उपवास केला. मी 36 किलो चंदनाची लाकडं यज्ञात आहुतीसाठी वापरली. मात्र 9 दिवसांनंतर माझे जे डिझायनर होते, ते मला म्हणाले की ममता तू खूप सिरिअस झाली आहे, या सगळ्यामध्ये. मग आम्ही ताज हॉटेलला गेलो. मी तीथे मद्याचे दोन पेग रिचवले असं ममता कुलकर्णीने म्हटलं आहे.