Published on
:
01 Feb 2025, 2:51 pm
Updated on
:
01 Feb 2025, 2:51 pm
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मत केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
तसेच विकसित भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकणाराही हा अर्थसंकल्प आहे. गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी (GYAN) या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवताना या अर्थसंकल्पाला असलेला सर्वसमावेशी आणि दूरदर्शीपणा मोदी सरकाराच्या विकासाच्या धोरणांचे प्रतीक आहे. करप्रणालीमध्ये बदल करताना १२ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करणे, हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने मध्यमवर्गीय घटकाला मोठा फायदा होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाखांपर्यंत नेणे, हाही महत्त्वाचा निर्णय आहे. हा अर्थसंकल्प सशक्त, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताच्या नवनिर्माणाला दिशा देणारा आहे, असेही ते म्हणाले.
समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यापासून तर उत्तम आरोग्य सुविधा, लघु उद्योगांचे सक्षमीकरण, विमा क्षेत्रातील गुंतवणूक आणि निर्यात धोरण या सर्व बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. शिवाय शेतकऱ्यांसाठीच्या योजना, एमएसएमई आणि महिला उद्योगांचे सक्षमीकरण, वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारासाठी उचललेली पावले आणि एआय प्रणालीला मिळणारे प्रोत्साहन याही महत्त्वाच्या बाबींना दिलेले स्थान मोदी सरकारची सर्वांगीण विकासाची कटिब्धता दर्शविते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.