संजय शिरसाटांच्या विधानावर चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रया:म्हणाले - त्यांचे विधान निव्वळ गुगली, पक्ष फुटण्यापूर्वी विचार का केला नाही?

2 hours ago 1
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत विधान केले होते. आता जोडण्याची वेळ आली असून अद्याप दोघांमधले अंतर वाढले नाही. त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता येतील, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली. संजय शिरसाट यांनी पक्ष फुटण्यापूर्वी हा विचार का केला नाही? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला. तसेच त्यांचे विधान नुसती गुगली आहे, असा टोलाही खैरे यांनी लगावला. राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीतील अनेक आमदार, खासदार आणि नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यातच संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. यावर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया देत संजय शिरसाटांना उपरोक्त टोला लगावला. काय म्हणाले चंद्रकांत खैरे? एकनाथ शिंदे यांना भाजपने वेगळे पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या भीतीपोटीच संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत अशी गुगली टाकली आहे. दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे शिरसाट म्हणत असतील तर त्यांनी हा विचार आधीच का केला नाही? असे चंद्रकांत खैरे म्हणाले. आधी तुमच्या बॉससोबत बोला, मग ठाकरेंकडे या आता भाजप यांना वेगळे करण्याची भीती आहे. म्हणून ते या सर्व गोष्टी बोलत असतील. शिरसाट यांनी त्यांचे बॉस एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकदा बोलावे आणि त्यांनी ठरवल्यावर मग उद्धव ठाकरे यांच्याकडे यावे, असा सल्ला खैरे यांनी दिला. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते चंद्रकांत खैरे पुढे बोलताना म्हणाले की, पक्षातून फुटण्याआधी उद्धव ठाकरे यांच्याशी मनमोकळेपणाने बोलले असते तर त्यांनी ऐकले असते. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायचे होते. पण परिस्थिती वेगळी झाल्यामुळे शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही, असे सांगत भविष्यात एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, असा दावा खैरे यांनी केला. बावनकुळेंची शिरसाटांना तंबी दरम्यान, संजय शिरसाट यांच्या विधानावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही तंबी दिली. कोणाला सोबत घ्यायचे, कोणासोबत राहायचे हा शिंदे गटाचा प्रश्न आहे. मात्र, महायुतीचे पक्ष प्रवेशासंदर्भात धोरण ठरले आहे. हे धोरण संजय शिरसाट यांनाही माहिती आहे. त्यामुळे अशा चर्चा करण्यात, मीडियातून मागणी करण्यात काही अर्थ नाही. आमदार शिरसाट यांनी रस्त्यावर चर्चा करणे थांबवावे, अशा शब्दांत बावनकुळे यांनी शिरसाटांना सुनावले. काय म्हणाले होते संजय शिरसाट? दोन शिवसेना झाल्या याचे फार दुःख होत असून संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही संजय शिरसाट म्हणाले. दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले पाहिजे. एका बाजूने प्रयत्नाने ते शक्य होणार नाही, असेही ते म्हणाले. दोन्ही पक्षांचे तार जुळत असतील तर माझा त्याला काहीच आक्षेप नाही. ज्यांचे तोंड पाहायची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर जाऊन बसले. माझ्याकडून 100 चुका झाल्या असतील पण एकमेंकांच्या चुका माफ करून एकत्र यायला हरकत नाही. पण हे होईल का नाही हा प्रश्न आहे, असा प्रयत्न एका बाजूने होऊन चालत नाही. ठाकरे गटाचे पदाधिकारी भेटले खूप वाईट वाटते. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने हा प्रसंग आला. ह्या लोकांनी शिवसेनाप्रमुखांना खूप त्रास दिला आहे. बाळासाहेब ठाकरेंचा धाक होता. तो आता ठाकरेंबद्दल राहिला नाही. त्यांना ते जपता आले नाही, असे संजय शिरसाट म्हणाले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article