पणजी : विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अभिनेता नाना पाटेकर. Pudhari File Photo
Published on
:
07 Oct 2024, 11:51 pm
Updated on
:
07 Oct 2024, 11:51 pm
पणजी : जल, जमीन संवर्धन काळाची गरज बनत असून ते शेतकर्यांच्या हिताचे आहे. राज्यातील शेतकर्यांच्या कल्याणासाठी ‘नाम फाऊंडेशन’च्या वतीने मदत करण्यास आपण तयार आहोत, अशी माहिती प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली.
गोवा विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बिझनेसमध्ये ‘व्यावसायिकता आणि सामाजिक बांधिलकी : नाम फाऊंडेशन एक अभ्यास’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. पूर्वा हेगडे-देसाई, प्रा. प्रणव मुखोपाध्याय, प्रा. नीलेश बोर्डे उपस्थित होते.
पाटेकर म्हणाले, ‘नाम फाऊंडेशन’ची सुरुवात ही नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकर्यांना मदतीच्या हेतूने झाली होती. जल, जमीन संवर्धनाच्या कामात फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्रात विशेष प्रयत्न करण्यात आले. त्याला स्थानिक शेतकरी, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून मोठी मदत झाली. त्यामुळे एक मोठे काम उभे राहिले. एखादे काम करण्याच्या संदर्भात तुमचा उद्देश स्वच्छ असेल, तर त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळतो. नाम फाऊंडेशनच्या कार्यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांचीही मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले.
शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये शेतकर्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. शेतीतील मिळणार्या उत्पन्नातही घट झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळेही शेतकरी हवालदिल झाला असल्याने त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीची गरज होती. जी आम्ही ‘नाम फाऊंडेशन’च्या वतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. राज्यातील शेतकर्यांना जलसंवर्धनाबरोबर इतर कामांमध्ये मदत हवी असल्यास आपण ती नक्कीच करू. नवी पिढी मोबाईलच्या मोहजाळात अडकत आहे. त्यामुळे निर्मिती प्रक्रियेकडे दुर्लक्ष होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
तरुणाईमध्ये ‘नानां’चे आकर्षण कायम
बेधडक अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणार्या नाना पाटेकर यांचे तरुणाईत आजही तितकेच आकर्षण कायम असल्याचे दिसून आले. अभिनेते नाना यांनी जमिनीशी आपले नाते कायम ठेवले आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना याचा वारंवार प्रत्यय आला. अत्यंत साध्या सुती कपड्यानिशी नानांनी साधलेला संवाद विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून गेला.