Published on
:
07 Feb 2025, 1:25 am
Updated on
:
07 Feb 2025, 1:25 am
सोलापूर ः शालेय पोषण आहाराची शासनाकडून नवीन पाककृती तयार केली आहे. त्यामध्ये खिरीला वगळण्यात आले आहे. त्यामुळे अंड्यानंतर आता विद्यार्थ्यांना खिरीपासूनही वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे पालकांतून संताप व्यक्त होत आहे. शासनाकडून शालेय पोषण आहाराच्या पाककृती वारंवार बदलण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना कोणता पोषण आहार मिळणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील चार लाख 68 हजार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. यामध्ये खिचडी, केळी, अंडी, प्राऊड, खीरीचाही समावेश होता. मात्र, आता पोषण आहारातून खिरीला वगळले आहे. खीर बंद झाल्याने विद्यार्थ्यांना कोणता गोड पदार्थ मिळणार हे येत्या काही दिवसात कळणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना काय पोषण आहार द्यायचा याच्या पाककृतीचे तीन आराखडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे प्राथमिक शिक्षण विभागाने पाठविले आहेत. त्यांच्या मान्यतेनंतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पोषण आहारात काय काय मिळणार हे स्पष्ट होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.
शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. पोषण आहारात खीर बनविताना अनेक अडचणी येत असल्यामुळे आहारातून खीर वगळण्यात यावी, अशी मागणी राज्यातील विविध शिक्षक संघटना, शिक्षकांनी शासनाकडे केली होती. त्यामुळे पोषण आहारातून खीर वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.
जिल्ह्यात जळवापास चार हजार शाळा आहेत. त्यातील हजारो शाळेत पोषण आहार व्यवस्थित दिला जातो. मात्र जिल्ह्यातील काही अशा शाळा आहेत, तेथे पोषण आहार फक्त कागदावरच असल्याचा दावा पालकांनी केला आहे. अशा शाळांचा शोध घेऊन कारवाई करण्याची गरज आहे.
शालेय पोषण आहाराच्या नवीन पाककृतीमधून खिरीला वगळले आहे. शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना काय आहार द्यायचा, त्याविषयीची फाईल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे पाठविली आहे. नवीन पाककृतीनुसार सीईओ जंगम हे निर्णय घेतील. त्यांच्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जाईल.
वैभव राऊत, लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग