मोठी बातमी समोर येत आहे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून सातत्यानं मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत, या विरोधात आता मुंडे देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी दमानिया यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे, याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली.
नेमकं काय म्हणाले मुंडे?
‘अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे.’