शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींचे समुपदेशन करा:जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या प्रशासनाला सूचना
3 hours ago
2
जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात राहणा-या विद्यार्थिनींचे विशेष शिबिरांच्या माध्यमातून परीक्षेच्या कालावधीत मानसिक आरोग्य तपासून घ्यावे. तसेच आवश्यकता असल्यास त्यांचे वेळीच योग्य समुपदेशन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी बुधवारी ता ५ दिल्या आहेत. हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महिला व बालविकास विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजीव एडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे, पोलीस निरीक्षक शालिनी नाईक, जिव्हाळा संस्थेच्या रोहिणी अलमुलवार, ज्योती कोथळजकर यांच्यासह समिती सदस्य तथा संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील शासकीय निवासी तसेच आदिवासी निवासी वसतिगृहात राहणा-या आणि परीक्षेच्या कालावधीत तणावाच्या प्राथमिक टप्प्यात असलेल्या विद्यार्थिनींचे समुपदेशन करावे. विशेष शिबिरांच्या माध्यमातून मानसोपचार तज्ज्ञांकडून हे समुपदेशन करण्याचा प्रायोगिक तत्वावर अभिनव उपक्रम राबविण्यात यावा. हा उपक्रम जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा समाज कल्याण विभाग, आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या योग्य समन्वयातून राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या. परीक्षा कालावधीत विद्यार्थिनी तणावात असतात; त्यांचे वेळेत मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन आणि समुपदेशन झाल्यास अनर्थ टाळता येऊ शकतो. विद्यार्थिनींवर आलेल्या तणावाचे जिल्हा यंत्रणेकडून योग्य आणि वेळीच व्यवस्थापन करण्याचा हा प्रयत्न राहणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील टप्प्यात घरगुती हिंसाचाराला बळी पडत असणाऱ्या महिला, जिल्ह्यातील तणावग्रस्त शेतकरी, आदिवासी विभागाच्या निवासी वसतिगृहात, सुधार गृह, निरीक्षणगृहांना भेटी देऊन त्यांचेही समुपदेशन करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी सांगितले. यावेळी भरोसा सेल, टोलफ्री क्रमांक १०९८, त्यावर प्राप्त तक्रारी, त्यांचे निरसन, समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणारे समुपदेशन यांचा आढावा घेतला. १०९८ या क्रमांकाची व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या. तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांकडून महिलांसाठी राबविण्यात येणा-या योजनांचाही जिल्हाधिकारी गोयल यांनी आढावा घेतला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)