हत्या करणाऱ्यांची पाठराखण करणारेच जातिवादी- वैभवी:सरपंच देशमुख कुटुंबीय नामदेवशास्त्रींना भेटले
3 hours ago
1
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांची देशमुख कुटुंबीयांनी रविवारी भगवानगडावर भेट घेतली. ‘माझ्या वडिलांची इतक्या क्रूरपणे हत्या झाली की त्यांचा एकही अवयव शाबूत नव्हता. त्या वेळी आमची मानसिकता काय असेल याचा विचार कुणी केलाय का?’ असा संताप देशमुखांच्या मुलीने महंतांसमोर व्यक्त केला. त्यावर नामदेवशास्त्रींनी ‘आम्ही आरोपींची कधीही पाठराखण करणार नाही, गड देशमुखांच्या पाठीशी आहे,’ असा शब्द दिला. दरम्यान, देशमुख कुटुंब नारायणगडावरही जाऊन महंत शिवाजी महाराजांकडे व्यथा मांडणार असल्याचे समजते. ‘धनंजय मुंडे निर्दोष आहेत, भगवान गड त्यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे,’ असे नामदेवशास्त्रींनी जाहीर केले होते. इतकेच नव्हे तर संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांची मानसिकताही समजून घेण्याची गरज आहे’, या त्यांच्या वक्तव्यावरुन वादंग माजले होते. महंत आरोपींच्या कृत्याचे समर्थन करत आहेत का? असे प्रश्नही उपस्थित झाले. या पार्श्वभूमीवर दिवंगत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय, मुलगी वैभवी यांनी रविवारी भगवान गडावर जाऊन महंतांची भेट घेतली. आपल्या वडिलांवर झालेल्या अत्याचाराची पोटतिडकीने, साश्रुनयनांनी महंतांपुढे बाजू मांडली.
हत्येची पार्श्वभूमी ऐकूनच महंतांनी बोलायला हवे होते : देशमुख वैभवी म्हणाली, ‘माझ्या वडिलांची अमानुषपणे हत्या केली. त्यांचा एकही अवयव शाबूत नव्हता. आजही ते फोटो मी पाहू शकत नाही. हत्येमागचे कारण व पार्श्वभूमी ऐकून घेतल्यानंतरच तुम्ही वक्तव्य करायला हवे होते. चांगले करायला गेले म्हणून त्यांची हत्या झाली. गुन्हेगारांना कोणी पाठीशी घालू नये. आरोपींचे समर्थन ज्याला करायचे त्यांनी करावे. त्याबद्दल काही बोलायचे नाही. आरोपींचे पाठराखण करणारेच जातिवाद करतात. माझ्या वडिलांनी कधी जातिवाद केला नाही. आमच्या शेतीत काम करणारे वंजारी समाजाचे आहेत. तो माणूस दलितांना वाचवण्यासाठी गेला, ज्याने कधी जातिवाद केला नाही. त्याला न्याय मिळावा म्हणून चाललेल्या लढ्याला एवढ्या फांद्या का फुटतात? तुम्ही आमचे गुरू आहात. तुमचा दर्जा खूप मोठा आहे. तुम्ही म्हणता एका चापटीने काय? पण तुम्ही सर्व ऐकून घ्यायला पाहिजे होते,’ अशा शब्दात वैभवीने महंतांना त्यांचे वक्तव्य चुकीचे होते याची जाणीव करून दिली. गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही : महंत महंत नामदेवशास्त्री म्हणाले की, ‘माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. मी तुमच्या पाठीशी आहे. गड कधीही गुन्हेगारांच्या बाजूने नाही. मी भगवानबाबांच्या गादीवर बसलोय. आरोपींना पाठीशी घालणार नाही. संतोष व धनंजय देशमुखच्या पाठीशी गड राहील. कुठेतरी जातीचा रंग दिला जातोय. त्याला थांबवण्याची गरज आहे. संतोष देशमुख बाबांना मानणारे होते ते मला आज कळाले. खऱ्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे.’ न्यायाची भूमिका असणाऱ्यांना महंतांनी चुकीचे ठरवू नये : धनंजय देशमुख धनंजय देशमुख म्हणाले, माझा भाऊ दलित सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली म्हणून गेला होता. तेव्हाच ॲट्रॉसिटीची तक्रार घेतली असती तर संतोषचा खून झाला नसता. ५४ दिवसांपासून आम्ही न्यायासाठी लढतोय. तुम्ही चुकीचे ठरवू नका. आरोपींविरुद्ध ४० ते ५० गंभीर गुन्हे आहेत. राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी न्यायाच्या भूमिकेत असताना त्यांना चुकीचे ठरवू नका.’
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)