ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ जुलै महिन्यात घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या अकाऊंटमध्ये दर महिन्याल 1500 रुपये जमा होता. तर विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास हा हप्ता 2100 करू असं आश्वासनंही महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिलं होतं. मात्र विरोध सातत्याने या योजनेच्या मुद्यावरून सरकारल धारेवर धरत आहेत. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनीही या योजनेवरून सरकारला खडे बोल सुनावले आहेत. ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती,सत्तेत येण्यासाठी करोडो लाडक्या बहिणीची चाचपणी न करता त्यांना पैसे देऊन टाकले, असा आरोप बच्चू कडू यांनी केला. सरकारने मतं घेतली मात्र आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद करणार, ही त्यांची फसवणूक आहे, त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्या लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे असेही बच्चू कडू म्हणाले.
सरकारने गुन्हा केला आहे
काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी लाडकी बहीण योजनेवरू सरकारवर टीक केली होती. लाडक्या बहिणींना ॲडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत, असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. तर काल त्यांनी पुन्हा सरकारला खडेबोल सुनावले. लाडकी बहिण योजनेतून अनेक महिला आता अपात्र ठरल्या जात आहेत. यामध्ये निवडणूक आयोगाने पारदर्शक विचार करून चौकशी केली पाहिजे,असे बच्चू कडू यावर म्हणाले.
डायरेक्ट नेत्याच्या खिशातून पैसे न जाता बजेट मधून सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मत ओढण्याचा प्रयत्न झाला आहे. ही स्कीम लाडक्या बहिणींसाठी नव्हती, तर सत्तेत येण्यासाठी होती. सत्तेत येण्यासाठी करोडो लाडक्या बहिणींची चाचपणी न करता त्यांना पैसे देऊन टाकले, असा आरोपकडू यांनी केला. तुम्ही (सरकारने) निकष न पाहता त्यांच्या खात्यात पैसे टाकले, मग आता म्हणता की त्या पात्र नाहीत. मग त्यांना पैसे द्यायच्या आधी पात्र ठरवायचं ना, पैसे दिल्यावर पात्र कसं ठरवायचं, असा सवाल विचारत हा क्राईम आहे, सरकारने गुन्हा केला आहे, असा घणाघाती हल्ला बच्चू कडू यांनी चढवला. सरकारने मतं घेतली, मात्र आता त्यांचे पैसे बंद करणार ही त्यांची फसवणूक आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्या लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे असेही कडू म्हणाले.
लाडक्या बहिणींकडील कारची सोमवारपासून तपासणी
पुण्यातील लाडक्या बहिणींकडील कारची येत्या सोमवारपासून तपासणी करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडे चारचाकी आढळल्यास, त्यांचं नाव योजनेतून वगळलं जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 75 हजार बहिणींच्या घरात चारचाकी गाड्या आढळल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून पुण्यात ही तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलेकडे चारचाकी गाडी आढळले, तिचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून वगळण्यात येईल. ज्यांच्याकडे वाहने असल्याचं निष्पन्न होईल, त्या बहिणींची नावे रद्द करण्यात येणार आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील 38 बहिणींनी आत्तापर्यंत माघार घेतली आहे. आधी 8 महिलांनी पैसे परत केले होते, त्या पाठोपाठ आता 30 महिलांनी पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आहे.