इंडियावादी संत जन्मले, वाल्ह्याचा वाल्मीक करून गेले:राजकारणाचे गुन्हेगारी करण करायचे आहे का? सदाभाऊ खोतांनी नामदेव शास्त्रींना फटकारले

2 hours ago 1
भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनीही नामदेव शास्त्रींवर हल्ला चढवला. धनंजय मुंडे 100 टक्के गुन्हेगार नाही. इतका त्रास सहन करणारा आमच्या क्षेत्रात संत झाला असता, असे नामदेव शास्त्री म्हणत आहेत. भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी । संत तुकोबांची ही वाणी गावगाड्याला बळ देऊन जाई. इंडियावादी संत जन्मले, वाल्ह्याचा वाल्मिक करून गेले, असा टोला सदाभाऊ खोत यांनी नामदेव शास्त्रींना लगावला. राजकारणाचे गुन्हेगारी करण करायचे आहे का? असा सवालही केला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचा कथित हात असल्याचा आरोप होत असल्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, अशावेळी ते एक दिवस भगवान गडावर मुक्कामाला थांबले होते. दुसऱ्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडेंना निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देत त्यांची पाठराखणही केली होती. त्यामुळे महंत नामदेव शास्त्री यांच्यावर चोहोबाजूने टीका होत आहे. काय म्हणाले सदाभाऊ खोत? सदाभाऊ खोत म्हणाले, संत तुकोबा अमूक अमूक एका समाजाचे संत आहेत, संत जनाबाई अमूक अमूक समाजाच्या संत होत्या, असे कधी ऐकले नाही.आणि या संतांनी कधी राजकीय सीमा ओलांडल्या नव्हत्या. पण आता इंडियावादी संत जन्माला आले आणि वाल्ह्याचा वाल्मिकी करून गेले, अशी टीका करत काय अधिकार आहे तुम्हाला बोलायचा? असा सवाल केला. तसेच कायद्यातून जे निष्पन्न होईल, दोषी आहे नाही हे न्यायालय ठरवेल,अशा शब्दांत कानउघडणीही केली. नामदेव शास्त्रींच्या बोलण्यावर बायबल लिहिले पाहिजे सदाभाऊ खोत पुढे बोलताना म्हणाले, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. त्याला जातधर्म नसते. पाकीटमार करणाऱ्याला मारझोड होत असते. नाही केली तर आज पाकिट मारले, उद्या तो दरोडा घालणार. साधू संतांच्या भाषेत सांगायचे म्हणजे हा दांभिकपणा आहे. आरोपींची काय मानसिकता तपासायला हवी होती? मला वाटते या महंतांचे दर्शन घेतले पाहिजे. त्यांच्या बोलण्यावर संशोधन झाले पाहिजे. त्यावर बायबल लिहिले पाहिजे. राजकारणाचे गुन्हेगारी करण करायचे आहे का? सदाभाऊ खोत म्हणाले, जे आहे ते सुखात आहोत. समाधानात आहोत असे सांगणारे साधू संत होते. हे राज्य गोरगरीबांसाठी उभे राहावे, रयतेचे राहावे. रयतेला चार दिवस आनंदाचे मिळावे, असा संदेश देणारे संत तुकोबा कुठे आणि दुसऱ्या बाजूला या प्रकरणावर बोलणारे कुठे? संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि लेकरांच्या डोळ्यातील अश्रूंबद्दल तुमच्या भावना काय आहेत? राजकारणाचे गुन्हेगारी करण करायचे आहे का? असा सवाल करत सदाभाऊ खोत यांनी नामदेव शास्त्री यांना फटकारले. फडणवीस देशमुख कुटुंबीयांना न्याय देतील मुख्यमंत्री हेडमास्तर रुपी आहेत. त्यांचा कायद्याचा चांगला अभ्यास आहे. माझ्यासारख्या माणसाने त्यांना काय सांगावे? संतोष देशमुख हा सामाजिक कार्यकर्ता होता. मामाच्या गावाला जाऊन तो सरपंच झाला. फडणवीस देशमुख कुटुंबीयांना न्याय देतील यात शंका नाही, असा विश्वासही सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article