Published on
:
11 Oct 2024, 1:05 am
Updated on
:
11 Oct 2024, 1:05 am
चिपळूण : कर्नाटकातून बंदी असलेले खैराचे लाकूड बेकायदेशीर आणून त्या विक्रीतून झालेल्या नफा ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेला पुरविल्याच्या आरोपाखाली चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथून सहाजणांना ताब्यात घेतले. यातील एकजण स्थानिक असून, पाचजण कर्नाटकातील आहेत. तसेच यावेळी लपवून ठेवलेले सुमारे दहा लाखाच्या किमतीचे 24 टन बेकायदेशीर खैर लाकूडदेखील जप्त करण्यात आले.
बुधवारी (दि. 9) सायंकाळी उशिरा नवी मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही धडक कारवाई केली. या प्रकाराने जिल्ह्यासह कोकण विभागात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत सावर्डे येथील मुआज रियाज पाटणकर या स्थानिकासह वसीमअख्तर मुक्तार अहमद मोमीन (रा. इस्लामपुरा भिवंडी), असीफ रशिद शेख (रा. नगरसूल, जि. नाशिक), फारूख शेरखान पठाण (रा. येवला-नाशिक), शाहनवाज प्यारेलाल (रा. बल्लापूर कर्नाटक), इरशाद युसुफ शेख (रा. संगमनेर, अहमदनगर, सर्व मुळ कर्नाटकातील) या सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एका आरोपीचा दहशतवादी ईसीस या संघटनेला पैसे पुरवित असल्याचा संशय पोलिसांना आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सहाजणांची टोळी कर्नाटकमधून शासनाने बंदी घातलेल्या खैराची बेकायदेशीर खरेदी करून ते सावर्डे येथे आणत असे. खैराची तोडणी आणि वाहतूक करुन त्याचा साठाही सबंधितांकडून केला जात होता. याची माहिती एटीएसपथकाला मिळाल्यानंतर त्यांनी सावर्डे येथेे गेले दोन दिवस एटीएसचे पथक तळ ठोकून होते. दोन दिवसाच्या माहितीनंतर पथकाने बुधवारी सायंकाळी त्या दृष्टीने पोलिस तपास करीत सावर्डे बाजारपेठेलगत असणार्या वस्तीतून एकाला व त्याच्यासोबत कर्नाटकमधील पाचजणांना ताब्यात घेतले.त्यांनी सावर्डेतील जामा मशिदीच्या बाजूला दहिवली गावाकडे जाणार्या रस्त्यापासून तीन कि.मी. अंतरावर मुआज रियाज पाटणकर याने भाड्याने घेतलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कर्नाटकातून बेकायदेशीररित्या खैराच्या लाकडाचा लपवलेला साठा ताब्यात घेतला. याची किंमत दहा लाख रूपयांच्यावर आहे.
एटीएसच्या पथकाने खैराचा साठा ताब्यात घेण्यासाठी लाकूड पोलिस व वन विभागाच्या अधिकार्यांना सोबत घेतले. केवळ खैराच्या तस्करीपुरती मर्यादीत नसून यातील एकजण ईसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून या खैराच्या लाकूड विक्रीतून मिळणारा नफ्यातील रक्कम इसिस या संघटनेला दिली जायची, असा एटीएस पथकाचा संशय असून त्यादृष्टीने तसा तपास सुरू केला आहे. दरम्यान, इसिससंबंधित असणार्या संशयितांना ताब्यात घेतल्याने रत्नागिरी, सिंधुदूर्ग सह कोकण विभागात एकच खळबळ माजली आहे.