ठाणे आपल्या सगळ्यांचे:जिल्ह्यात काही अडचणी आल्या तर अधिकाऱ्यांशी बोलणार, संपर्कमंत्री होताच गणेश नाईकांचे सूचक वक्तव्य

3 hours ago 1
माझी ठाणे जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. मी पालघरचा पालकमंत्री आहे. जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो. महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथे पाहिजे तिथे दरबार घ्यावा, मी ठाण्यात जनता दरबार घेणार, असे भाजपचे नेते गणेश नाईक यांनी म्हटले आहे. दरम्यान गणेश नाईक पुढे बोलताना म्हणाले की, ठाणे आपल्या सगळ्यांचे आहे. ठाण्यात काय अडीअडचणी आल्या तर संबंधित अधिकाऱ्यांना देखील आपण बोलू. जनता दरबारमध्ये लोकांच्या अडचणी समजून घेऊन दूर करणे हे चांगलेच आहे. मी सगळ्यांना सांगितले आहे. एकनाथ शिंदेंच्या आणि अजित पवारांच्या सर्व मंत्र्यांना देखील नवी मुंबईमध्ये आणि प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घ्यावा, असेही ते म्हणाले आहेत. शिंदेंना घेरण्यासाठी रणनिती का? ठाण्यामध्ये येत्या निवडणुकीत कमळ फुलवायची भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा असल्याचे गणेश नाईक यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत ठाणे शहर आणि जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये एकमेकातच वाद पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांच्या होमग्राउंड ठाण्यात नाईक यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. नाईक यांनी आपण आता “जनता दरबार’ घेणार असल्याचे सांगितले. दरम्यान, भाजप आता शिंदे यांना ठाण्यात शह देण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना त्यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करत आणि त्यानंतर ठाण्याच्या संपर्कमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर अप्रत्यक्षपणे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. भाजपने केला होता ठाण्यावर दावा लोकसभा निवडणुकीपासून भाजप आणि शिंदे गटात राजकीय वर्चस्वासाठी लढाई सुरू आहे. कारण ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे अधिक आमदार असल्याचा युक्तिवाद करत लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने या मतदारसंघावर दावा केला होता. मात्र ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे यांचा दबदबा होता. जर ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी सोडला तर जनतेमध्ये जाणे कठीण होईल. हा युक्तिवाद देत, एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपकडे त्यांच्या पक्षासाठी ठाणे लोकसभेची जागा मागितली.त्या वेळी शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी (शिंदे गट) सोडला. मात्र ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा ध्यास आजही भाजपच्या आमदारांना आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article