दिव्य मराठीच्या वृत्तानंतर शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय:बारावीच्या परीक्षेसाठी कस्टोडीयन बदलण्याचा निर्णय रद्द; विज्युक्टाचे आंदोलन मागे
3 hours ago
1
अमरावती शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेसाठी कस्टोडीयन आणि पर्यवेक्षक बदलण्याचा घेतलेला निर्णय अखेर मागे घेतला आहे. दिव्य मराठीने या संदर्भात शुक्रवारच्या अंकात प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर ही कारवाई झाली आहे. ११ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या केवळ दहा दिवस आधी घेतलेल्या या निर्णयाविरोधात विदर्भ ज्युनियर कॉलेज टिचर्स असोसिएशन (विज्युक्टा) ने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांच्या नेतृत्वात १ फेब्रुवारीला धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता, मात्र मंडळाने आपला निर्णय मागे घेतल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. अमरावती विभागातील ५४२ केंद्रांवर १ लाख ५२ हजार ३४४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या केंद्रांवर नियुक्त केलेल्या कस्टोडीयन आणि पर्यवेक्षकांना आधी लेखी आदेश देऊन त्यांच्या नियुक्तीची माहिती दिली होती. मात्र एका दिवसापूर्वी या आदेशात बदल करून नवे आदेश जारी करण्यात आले होते. शिक्षकांनी या निर्णयाला शिक्षकांवरील अविश्वास म्हणून पाहिले होते. विज्युक्टाच्या पदाधिकाऱ्यांनी मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल साबळे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. सहसचिव प्रा. रंगराव लांजेवार, जिल्हाध्यक्ष प्रा. मंगेश कांडलकर आणि जिल्हा सचिव प्रा. साहेबराव जुमडे यांनीही या प्रकरणी कठोर भूमिका घेतली होती. शिक्षकांच्या विरोधानंतर आणि दिव्य मराठीच्या वृत्तप्रसिद्धीनंतर शिक्षण मंडळाने आपला निर्णय मागे घेतला आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)