Published on
:
11 Oct 2024, 12:20 am
Updated on
:
11 Oct 2024, 12:20 am
कणकवली ः हवामान आधारित फळपीक विमा योजना 2023-24 या वर्षासाठी राज्य सरकारने आपल्या हिश्श्याची आंबा, काजू फळपिकांची सिंधुदुर्गसाठीची 25.67 कोटींची रक्कम रिलायन्स विमा कंपनीकडे भरली आहे. महाविकास आघाडीने यासाठी पाठपुरावा करत जे आंदोलन केले त्याच्या दणक्यानंतर ही कार्यवाही झाली आहे. केंद्रशासनही येत्या दोन दिवसांत आपल्या हिश्श्याचे पैसे विमा कंपनीकडे भरणार आहे. त्यामुळे येत्या 8 दिवसात सिंधुदुर्गातील आंबा, काजू उत्पादक शेतकर्यांच्या खात्यावर फळपीक विम्याचे पैसे जमा होतील,अशी माहिती कृषी आयुक्त आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांनी दिल्याची माहिती ठाकरे शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांनी दिली.
ते म्हणाले, जुलै महिन्यात शेतकर्यांच्या खात्यावर फळपीक विम्याचे पैसे जमा होणे आवश्यक होते; मात्र राज्य आणि केंद्र शासनाने आपल्या हिश्श्याचे पैसे विमा कंपनीकडे न भरल्याने कंपनीने शेतकर्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा केली नव्हती. याबाबत ठाकरे शिवसेनेसह महाविकास आघाडीने पाठपुरावा करत आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल कृषी आयुक्तांनी घेऊन राज्य शासनाच्या हिश्श्याचे पैसे विमा कंपनीकडे जमा केल्याचे सांगितले.
फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2023-24 च्या राज्य हिश्श्यापोटी सिंधुदुर्गसह इतर जिल्ह्यांची रिलायन्स जनरल इन्श्यूरन्स कंपनी यांना 80 कोटी 70 लाख 42 हजार 742 एवढी रक्कम वर्ग केल्याचे पत्र कृषी आयुक्त पुणे यांच्या संदेशानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांनी आ. वैभव नाईक यांना पाठविले आहे. त्याची रिसीटही त्यांनी पाठविली आहे. केंद्र शासनही येत्या दोन दिवसांत आपला हिस्सा विमा कंपनीकडे जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.